Fertilizer Price Hike 2025: राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या किमतीत झालेली सतत वाढ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आधीच विस्कटून टाकत होती आणि आता सुरू होणाऱ्या नवीन हंगामाच्या तोंडावर खते पुन्हा एकदा महाग झाली आहेत. उत्पादन खर्च आधीच डोकं वर काढत असताना, या नव्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
शेतकऱ्यांसाठी अन्नद्रव्ये असलेली ही खते पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. मात्र, शासनाने आणि कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार, अनेक लोकप्रिय खतांच्या किमतीत २०० ते २५० रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः कांदा, गहू, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांसाठी लागणारी ही खते महाग झाल्याने खर्चात मोठी वाढ होणार आहे.
कोणत्या खताचे दर किती वाढले?
खालील दिल्याप्रमाणे अनेक महत्त्वाच्या खतांच्या किमतीत आता सरळ वाढ नोंदवली गेली आहे:
10:26:26 खत
जुना दर: ₹1850
नवा दर: ₹2100
वाढ: ₹250
24:24:0 खत
जुना दर: ₹1700
नवा दर: ₹1900
वाढ: ₹200
20:20:0 खत
जुना दर: ₹2300
नवा दर: ₹2650
वाढ: ₹350
14:35:14 खत
जुना दर: ₹1800
नवा दर: ₹1975
वाढ: ₹175
पोटॅश (Potash)
जुना दर: ₹1700
नवा दर: ₹1900
वाढ: ₹200
हे पाहून स्पष्ट होते की फक्त २००-२५० रुपयेच नव्हे, तर काही खतांमध्ये वाढ ₹३५० पर्यंत पोहोचली आहे, जी शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
शेतकऱ्यांची वाढती चिंता, खर्च वाढला
खतांचा खर्च वाढत असताना शेतीमालाचे दर मात्र घसरतच आहेत. सोयाबीन, कांदा, मूग, तूर यांना काही महिन्यांपासून योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणि आता खतांच्या वाढीमुळे त्यांचा खर्च आणखी वाढणार आहे.
उन्हाळी कांदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना तर मोठा फटका बसणार आहे, कारण एकरी साधारण ४ बॅगा खतांची गरज असते. आता या चार बॅगांवरच अनेकांना ₹८०० ते ₹१००० पर्यंत अधिक खर्च येणार आहे. शेतकऱ्यांना काय पिकवावे आणि काय नाही? असा यक्षप्रश्न भेडसावू लागला आहे. जुन्नर तालुक्यातील विक्रेत्यांनी सांगितल्याप्रमाणे, शेतकऱ्यांमध्ये यंदा नाराजीचाच सूर अधिक जाणवतोय.
शेतकरी श्री. सीताराम डुंबरे म्हणाले की, एका वर्षापासून सोयाबीन आणि कांदा भाव कोसळलेत आणि आता खतांचे दर प्रत्येक बॅगेला २००-२५० रुपयांनी वाढले. मग आमचं गणित जुळणार तरी कसं? आता खरंच कधी नव्हे ते इतका गोंधळ उडालाय.